महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूराने केला कहर – तब्बल सत्तर लाख एकर पिकांचे नुकसान! पंजाबपेक्षा महाराष्ट्रात अधिक हानी;मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धार्मिक संस्था, बँका, आमदार-खासदारांचा ओघ…
पंजाबपेक्षा महाराष्ट्रात अधिक हानी;मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धार्मिक संस्था, बँका, आमदार-खासदारांचा ओघ...
मुंबई : तुळजापूरनामा न्युज
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने महाराष्ट्र राज्यात मोठे नुकसान झाले आहे. तब्बल सत्तर लाख एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. १३ कोटी ३९ लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात या आपत्तीचा फटका ग्रामीण भागाला सर्वाधिक बसला आहे. तुलनेत पंजाब राज्यात केवळ पाच लाख एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी समाजातील विविध घटक, धार्मिक संस्था, बँका तसेच लोकप्रतिनिधी मदतीचा हात पुढे करीत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थानने एक कोटी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूरने एक कोटी, तसेच गजानन महाराज संस्थान शेगावने एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत दिली आहे.

तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक कोटी, लालबागचा राजा गणपती मंडळ, मुंबईने ५० लाख, तर मुंबईचा राजा गणपती मंडळाने पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. धाराशिव येथील तेरणा चॅरिटेबल ट्रस्टनेही ५१ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दहा कोटी, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी २५ लाख, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी अडीच लाख, प्रवीण दरेकर यांच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे अकरा लाख, तर भाजपाचे वि.के. सिंग ठाकूर यांनी एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहेत.

व्ही.के. ग्रुपच्या वतीने एक कोटी, भाजपाचे आमदार विनोद शेलार यांनी २१ लाख, आमदार संजय उपाध्ये (बरेली) यांनी ११ लाख, आळंदी देवस्थानाने २१ लाख, मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी ५१ लाख, तर मंत्री उदय सामंत यांनी ११ लाख रुपये निधीस दिले आहेत.

स्वःता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पहाणी करताना
माजी खासदार सदाशिव लोखंडे (शिर्डी) यांनी आपल्या तीन महिन्यांच्या पेन्शनची रक्कम पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. याशिवाय राज्यभरातील माजी आमदार, खासदार, विविध संस्था, कंपन्या आणि पवनचक्की प्रकल्प धारकांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, बरेली येथे आयोजित गरबा महोत्सवातून विविध संस्थांकडून तब्बल ५५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्यात आले आहेत.राज्यातील शेतकरी वर्गाला अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यातून उभं राहण्यासाठी शासन आणि समाज एकत्र आले आहेत. मात्र नुकसानाच्या प्रमाणावरून पाहता, मदतीची ही रक्कम अद्याप अपुरी असल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.



