अत्याचारविरोधी लढ्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची; ॲड. मंजुषा साखरे यांचे प्रतिपादन
अत्याचारविरोधी लढ्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची; ॲड. मंजुषा साखरे यांचे प्रतिपादन

अत्याचारविरोधी लढ्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची; ॲड. मंजुषा साखरे यांचे प्रतिपादन
धाराशिव : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजावरील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव रोखण्यासाठी केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर त्यांची कठोर व प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मंजुषा विशाल साखरे यांनी केले.

धाराशिव पोलीस नागरी हक्क संरक्षण पथकाच्या वतीने आयोजित ‘नागरिकांच्या माहिती व हक्कासाठी मार्गदर्शन शिबिर तथा नागरी कार्यशाळे’त त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी त्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींची सविस्तर माहिती देत नागरिकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

ॲड.मंजुषा साखरे म्हणाल्या की,अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय रोखण्यासाठी सामाजिक सलोखा,कायद्याचे ज्ञान आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास महत्त्वाचा आहे. अत्याचार व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर शासन आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थिती, दलित आणि वंचित समाजाने भोगलेल्या संघर्षाची पार्श्वभूमी तसेच आजच्या काळातील सामाजिक न्यायाचे महत्त्व यावर त्यांनी अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाष्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना कायद्याविषयी सखोल माहिती मिळाली.

सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक अश्वता दोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची जाणीव करून देत सामाजिक न्यायाच्या लढ्यात कायद्याची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा प्रभावी संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.



