जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार उघडकीस आणत अमीर शेख यांच्याकडून धडाकेबाज तक्रार; मंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आश्वासन!

जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार उघडकीस आणत अमीर शेख यांच्याकडून धडाकेबाज तक्रार; मंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आश्वासन!
नागपूर : राज्याच्या हिवाळी २०२५ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कथित गैरव्यवहारावर गंभीर चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना नागपूर विधानभवन परिसरात भेट देऊन धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अपसिंगा–काक्रंबा संयुक्त जलपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत नागरिक आमीर शेख यांनी सविस्तर निवेदन दिले.
शेख यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले जाणारे आर्थिक गैरप्रकार, निकृष्ट दर्जाचे काम, प्रशासकीय दुर्लक्ष, तसेच मागील काही महिन्यांपासून विविध अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची संपूर्ण माहिती सादर केली. कार्यकारी अभियंता, उपमुख्य अभियंता, तसेच मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेक वेळा लेखी तक्रारी व पुरावे पाठवूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या गैरव्यवहाराला खुली वाट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अधिवेशनाच्या ताणलेल्या वातावरणात ही भेट विशेष लक्षवेधी ठरली. शेख यांनी दिलेल्या माहितीमध्ये कामाच्या अंदाजपत्रकातील तफावत, ठेकेदारांना दिलेली सवलत, प्रत्यक्ष भूयारी कामांच्या तपासणीत आढळलेली त्रुटी, तसेच ग्रामस्थांनी वारंवार नोंदवलेल्या समस्या यांचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला होता. या सर्व पुराव्यांचा अभ्यास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली.
यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सादर केलेली समस्त कागदपत्रे तपासण्याचे आश्वासन दिले. “गैरव्यवहारास कोणतीही मुभा दिली जाणार नाही. प्रस्तुत प्रकरणात वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती शेख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचे भवितव्य या योजनेवर अवलंबून असल्याने जनतेतही या प्रकरणाबाबत मोठी उत्सुकता आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुढे आणखी गाजण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.




