त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात ५६ भोग नैवेद्य अर्पण
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात ५६ भोग नैवेद्य अर्पण
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात ५६ भोग नैवेद्य अर्पण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सहपत्नीक उपस्थित राहून भगवान लक्ष्मी नरसिंह यांच्या चरणी ५६ भोग नैवेद्य अर्पण करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिराचे तहसीलदार माया माने देखील विशेष उपस्थित होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ दिसून येत होती. भगवान नरसिंहाच्या मूर्तीवर पुष्प, फळे व सुगंधी द्रव्यांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शंखनाद, वेदघोष आणि घंटानादाच्या मंगल ध्वनीत पवित्र वातावरणात नैवेद्य अर्पण विधी पार पडला.

या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी श्री गणेश गुरुजी नंदीबुवा अंबुलगे, श्री महेश गुरुजी नंदीबुवा अंबुलगे, तसेच श्री सुनील बंडू पाठक व श्री स्वप्निल भालचंद्र पाठक यांनी पारंपरिक विधीने पूजा-अर्चा केली. त्यांचे सहकार्य व श्रद्धाभावामुळे मंदिर परिसरात अध्यात्मिक उर्जा अनुभवास आली.
कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. मंदिर संस्थानतर्फे या प्रसंगी उत्कृष्ट फुलांची सजावट, दीपप्रज्वलन व सुवासिक धूपाच्या सुगंधाने सजलेले वातावरण पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.
त्रिपुरारी पौर्णिमा ही भगवान विष्णूने त्रिपुरासुराचा वध करून धर्मसंस्थापना केलेल्या घटनेचे प्रतीक मानली जाते. त्या निमित्ताने दरवर्षी तुळजाभवानी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या या दिवशी श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात झालेला हा भव्य सोहळा भक्तांच्या मनात अविस्मरणीय ठरला.



