कळंब येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी ;शेतकऱ्यांच्या वतीने बब्रुवान गोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन
कळंब येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने बब्रुवान गोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन
कळंब येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या वतीने बब्रुवान गोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन
कळंब : भिकाजी जाधव
कळंब तालुक्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बब्रुवान गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कळंबचे तहसीलदार मा. हेमंत ढोकले यांना दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची काढणी-मळणी सुरू असून सोयाबीन विक्रीसाठी तयार आहे. मात्र बाजारात व्यापारी शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी म्हणजेच प्रती क्विंटल तीन ते चार हजार रुपयांपर्यंत दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तसेच रब्बी हंगामाची पेरणीही सुरू होणार आहे. खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केल्याशिवाय पर्याय उरत नाही.
तथापि, शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे उशिरा सुरू होत असल्याने व्यापारीच लाभ घेतात आणि शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हितासाठी कळंब येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर बब्रुवान गोरे, मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, प्रवीण जाधव, अमोल शिंगटे, नेताजी कवडे, बप्पासाहेब जावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




