ब्रेकिंगमहाराष्ट्र
दानपेटी प्रकरणावर गैरसमज दूर मंदिर संस्थान व प्रशासनाचा खुलासा;दानपेटी नियमांवर मंदिर संस्थानचा खुलासा : भाविकांची फसवणूक रोखण्यासाठीच निर्णय
दानपेटीतील वस्तू ‘दान’च : तुळजाभवानी मंदिर संस्थानची ठाम भूमिका

0
7
6
4
8
7
दानपेटी प्रकरणावर गैरसमज दूर मंदिर संस्थान व प्रशासनाचा खुलासा;दानपेटी नियमांवर मंदिर संस्थानचा खुलासा : भाविकांची फसवणूक रोखण्यासाठीच निर्णय
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ श्री. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दानपेटी संदर्भात सुरू असलेल्या चर्चांवर मंदिर संस्थान व जिल्हा प्रशासनाने स्पष्ट व ठाम भूमिका मांडली आहे. भाविकांकडून नजरचुकीने दानपेटीत पडलेल्या मौल्यवान वस्तू या ‘दान’ म्हणूनच ग्राह्य धरल्या जातील व त्या परत दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय भाविकांची फसवणूक करण्यासाठी नसून दानपेटीतील व्यवहार पारदर्शक व सुरक्षित ठेवण्यासाठीच असल्याचे मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे.
अलीकडच्या काळात “मंदिर संस्थान भाविकांची लूट करत आहे” अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसून, हा निर्णय ३ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलेला ठराव असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या नियमामागील प्रमुख कारण म्हणजे दानपेटीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखणे. यापूर्वी काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी खोटे दावे करून दानपेटीतील मौल्यवान वस्तू मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे मंदिराच्या दानव्यवस्थेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी हा कठोर पण आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे.मंदिर संस्थानने प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे की, अर्धवट माहितीच्या आधारे गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करू नयेत. तसेच भाविकांनी दर्शनावेळी दानपेटीत रक्कम अर्पण करताना आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, जेणेकरून असे प्रसंग टाळता येतील, अशी विनंतीही प्रशासनाने केली आहे.
मंदिर संस्थानने घेतलेला हा निर्णय श्रद्धा, सुरक्षितता व पारदर्शकतेच्या दृष्टीने आवश्यक असून, दानव्यवस्थेची पवित्रता जपण्यासाठी तो महत्त्वाचा असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
7
6
4
8
7



