तुळजापुरात मध्यरात्री रक्तरंजित थरार; युवकावर धारदार शस्त्राने खोलवर वार, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ?

तुळजापुरात मध्यरात्री रक्तरंजित थरार; युवकावर धारदार शस्त्राने खोलवर वार, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ?
तुळजापूर :तुळजापूर शहरातील जुनी कन्या प्रशाला परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने तुळजापूर शहर हादरले आहे. या घटनेत पार्थ कऱ्हाडे (उपाध्ये पुजारी), वय अंदाजे २० ते २२ वर्षे, रा. रावळ गल्ली हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने युवकाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी हात डोक्यावर घेतल्याने हाताच्या शिराही गंभीररीत्या जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, युवक अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याने हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.शहरात हल्ले, खून, जबर हाणामारी, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीयुक्त संताप व्यक्त होत आहे.तुळजापूरची कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली असून पोलिसांचा धाकच उरलेला नाही दर एक दोन दिवसाला एखादा रक्तरंजीत गुन्हा शहरात घडत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“एमडी ड्रग्जचा तुळजापुरात पुन्हा शिरकाव?; वाढत्या गुन्हेगारीने नागरिक धास्तावले”
तुळजापूर शहरात पुन्हा एकदा एमडी ड्रग्जची खुश्कीच्या मार्गाने वाहतूक व पुरवठा सुरू झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांनी केला आहे. या अंमली पदार्थांच्या वाढत्या साखळीमुळे शहरातील गुन्हेगारीत अभूतपूर्व वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चोरी, मारामाऱ्या, घरफोडी, जबरी हल्ले आणि तरुणांमध्ये वाढते व्यसन यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “ड्रग्ज माफियांना कोणाचा वरदहस्त आहे का?” असा सवाल उपस्थित होत असून पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून शहरातील अमली पदार्थांचा पुरवठा रोखावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



