जीवघेणी टीईटी परीक्षा रद्द करावी – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे निवेदन
जीवघेणी टीईटी परीक्षा रद्द करावी – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे निवेदन
जीवघेणी टीईटी परीक्षा रद्द करावी – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे निवेदन
कळंब : भिकाजी जाधव
राज्यातील शिक्षकांच्या मुळावर उठलेली टीईटी परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसह विविध शिक्षणविषयक मागण्यांचे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे यांना धाराशिव येथे देण्यात आले.
या निवेदनात संघटनेने २००५ पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावे, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व दर्जेदार मध्यान्ह भोजन देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
शाळांमध्ये पूर्ण वेळ मोफत इंटरनेट, वीज, शुद्ध पिण्याचे पाणी व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करावी, दिवाळी सुट्टीच्या काळात घेतले जाणारे शिक्षक प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतरच घ्यावे, तसेच पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनोन्नती द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या.
या प्रसंगी राज्य सरचिटणीस संतोष भोजने, जिल्हा अध्यक्ष अनंत फुलसुंदर, तसेच गोरे सर, माळी सर, सुरवसे सर, पंकज काटकर, लहु सुरवसे, विशाल जाधव, भालेकर आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.
निवेदनानंतर मंत्री जयकुमार गोरे यांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन शासनस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले.



