देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व हरपले; खरा खुरा दादा काळापडद्याआड अजित दादा म्हणजे कामाची गती – श्रीकृष्ण सूर्यवंशी

0
7
6
5
0
5
महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व हरपले; खरा खुरा दादा काळापडद्याआड अजित दादा म्हणजे कामाची गती – श्रीकृष्ण सूर्यवंशी
तुळजापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाम निर्णय, प्रशासनावर मजबूत पकड आणि कामाच्या वेगासाठी ओळखले जाणारे कणखर नेतृत्व आज काळापडद्याआड गेले आहे. खरा खुरा दादा, आमचे आधारवड, आमचे आधारस्तंभ, लाडक्या बहिणीचा भाऊ असलेले अजित दादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राज्याने केवळ एक नेता नाही, तर विकासाचा ध्यास घेऊन चालणारा दिशादर्शक हरपला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका प्रमुख श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी भावना व्यक्त केल्या.अजित दादा म्हणजे केवळ एक नाव नव्हे, तर कामाची गती, निर्णयांची ठामता आणि विकासाची स्पष्ट दिशा होती. राजकारणात बोलघेवडेपणा किंवा दिखाऊपणाऐवजी प्रत्यक्ष कामातून आपली ओळख निर्माण करणारे ते नेतृत्व होते, असे सूर्यवंशी म्हणाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकासाचा वेग थांबला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजित दादांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत निर्णयक्षमतेचे आणि कार्यक्षम प्रशासनाचे आदर्श उदाहरण घालून दिले. टीका, संघर्ष, विरोधकांच्या राजकीय खेळी आणि कठीण प्रसंगांतही ते कधीही मागे हटले नाहीत. उलट अशा परिस्थितीत त्यांनी अधिक ठाम निर्णय घेत राज्याला विकासाच्या मार्गावर नेले.
शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज, सिंचन योजना, कामगारांसाठी हक्काचे निर्णय, सामान्य नागरिकांसाठी सुविधा आणि प्रशासनासाठी शिस्त — या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. अनेक वेळा त्यांचे निर्णय कठोर वाटले, पण त्या निर्णयांनीच राज्याच्या विकासाचा भक्कम पाया घातला, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.त्यांची कार्यसंस्कृती, वेळेचे नियोजन, कामातील काटेकोरपणा आणि परिणामकारक अंमलबजावणी हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ताकद असून तीच शिकवण पुढे घेऊन जाण्याचा निर्धार आम्ही करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.या दु:खद प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुक्याच्या वतीने श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दादा गेले असले तरी त्यांचे विचार, कार्य आणि विकासाची दृष्टी कायम आमच्यासोबत राहील. त्याच वाटेवर चालत आम्ही जनतेसाठी काम करत राहू,असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

0
7
6
5
0
5



