केशेगावात थरार! पानटपरी चालकाचा निघृण खून — वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तरुणाचा संताप उसळला!
, “मानवी संबंधांवर सूडबुद्धीने घेतलेला बळी”
केशेगावात थरार! पानटपरी चालकाचा निघृण खून — वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तरुणाचा संताप उसळला!

नळदुर्ग : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे आज दि. १ नोव्हेंबर सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात अक्षरशः खळबळ उडाली आहे. वडिलांच्या अपघाती मृत्यूचा सूड घेण्यासाठी एका तरुणाने पानटपरी चालकाचा कुऱ्हाडीने भरचौकात निर्घृण खून केला. या घटनेने गावात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयताचे नाव गुरुसिद्धप्पा दहीटणे (वय ३५, रा. केशेगाव) असे असून, आरोपीचे नाव निखिल कांबळे असे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी निखिल कांबळे हा बेरोजगार असून, सुमारे ८ ते १० वर्षांपूर्वी त्याचे वडील दहीटणे यांच्या पानटपरीवर विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडले होते. त्या घटनेपासूनच निखिलच्या मनात गुरुसिद्धप्पा यांच्याविषयी संताप दाटून राहिला होता.
पुणे येथे राहत असलेला आरोपी काही कामानिमित्त गावाकडे आला होता.आज अचानक संतापाच्या भरात निखिलने दहीटणे यांच्या टपरीसमोर जाऊन भर चौकात कुऱ्हाडीने नरड्यावर सलग दोन वार करत जख्मी केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या दहीटणे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या थराराने उपस्थित नागरिकांमध्ये एकच आरडाओरड झाली.
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग व इटकळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी तात्काळ गुप्त माहितीच्या आधारे तांदुळवाडी परिसरात पुण्याला जात असताना आरोपी निखिल कांबळे याला अटक केली.सध्या या प्रकरणाचा तपास नळदुर्ग व इटकळ पोलीस ठाण्याचे पथक करत असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या निर्घृण हत्येमुळे केशेगाव परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले असून, “मानवी संबंधांवर सूडबुद्धीने घेतलेला बळी” म्हणून ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.



