कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार; शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला!
कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार; शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला!
कळंब : भिकाजी जाधव
कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला कालच्या रविवारच्या रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने अक्षरशः हिरावून घेतला आहे.
गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांनी उरलेसुरले सोयाबीन काढून शेतात साठवले होते. मात्र, रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे सोयाबीन पाण्यात भिजून गेले आहे. भरडून ठेवलेले सोयाबीन चिखलात मिसळल्याने त्याचा पूर्णत: नाश झाला आहे.
या अनपेक्षित पावसामुळे परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळण्याची आशा आता धूसर झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक कुटुंबांच्या घरांची पडझड झाली असून, नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
शेतकऱ्यांची अवस्था अक्षरशः दयनीय बनली आहे. “राजाने मारले, कुत्र्याने चावले, आणि पावसाने झोडपले – दाद मागायची कोणाकडे?” असा उद्विग्न प्रश्न आज ग्रामीण भागातील शेतकरी विचारताना दिसत आहे.
या अतिवृष्टीने केवळ शेतीच नव्हे, तर ग्रामीण अर्थकारणही ठप्प झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



