दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आकाश कोसळलं;कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आकाश कोसळलं;कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
कळंब : भिकाजी जाधव
कळंब तालुक्यात पावसाचा महाप्रलय दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आकाशाने संतापाचा पाऊस बरसवला आहे. कळंब तालुक्यात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
गावातच पाणी शिरलं
बाभळगाव परिसरात पावसाचे पाणी थेट गावात शिरल्याने अनेक घरांमध्ये पाण्याचे साचलेले थर दिसत आहेत. संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून खराब झालं असून, नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अंदोरा–बाभळगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रस्ते जलमय, वाहतूक ठप्प
कोठाळवाडी, भोगजी आणि खामसवाडी–मोहा हे ग्रामीण भागाला जोडणारे महत्त्वाचे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना लांबचा आणि खडतर पर्यायी मार्ग वापरावा लागत आहे. काही ठिकाणी छोटे पुलसुद्धा पाण्याखाली गेले असून ग्रामस्थांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घराबाहेर पडणं टाळलं आहे.
शेतकरी बळीराजाला पुन्हा मोठा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतात साचलेल्या पाण्यामुळे उभं पीक आडवं पडलं आहे. सोयाबीन, मूग, उडीद, तूर यासारख्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नुकतीच सावरू लागलेली शेती पुन्हा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हातात डोकं घेऊन बसले आहेत.“कर्ज, मेहनत आणि आशा – सगळंच पाण्यात गेलं,” असं हतबल शब्दांत शेतकऱ्यांनी वेदना व्यक्त केल्या.
दहिफळ ओढा धोक्याच्या टप्प्यावर दहिफळ ओढ्याची पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. “पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाणं टाळा आणि अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका,” असं प्रशासनाने आवाहन केले आहे.
मांजरा धरणातून विसर्ग वाढला
मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांडव्याच्या सहा वक्रद्वारे एक मीटरने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या १८,७४५ क्युसेक्स इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीकाठावरील आणि ओढ्यालगतच्या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेआव्हान प्रशासनाने केली आहे.




