ब्रेकिंगमहाराष्ट्र
अन्न-औषध प्रशासन कोमात; शहर व ग्रामीण पोलीसठाणे वसुलीत जोमात ?
गुटखा माफियांचा सुळसुळाट; ३० मार्चला अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

0
7
6
5
0
5
गुटखा माफियांचा सुळसुळाट; ३० मार्चला अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अन्न-औषध प्रशासन कोमात; शहर व ग्रामीण पोलीसठाणे वसुलीत दंग ?
तुळजापूर : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात व विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी ३० मार्च २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धाराशिव येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.यासंदर्भात सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहर व तालुक्यात कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात होत असून ग्रामीण व शहरी भागात मोठमोठी गोदामे उभारून त्या ठिकाणाहून होलसेल पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही प्रत्यक्षात ही बंदी केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप समितीने केला आहे.शहरासह ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असल्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असतानाही संबंधित प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही या मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र ठोस कारवाई न झाल्याने काही अधिकाऱ्यांचे गुटखा माफियांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय निर्माण होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.याच पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील बावी (का) परिसरात काही टपरी , हॉटेल, दारू विक्री, ढाबाचालकांकडून वसुली होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत असून त्यामुळे अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष बळ मिळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी दोन नंबरच्या धंद्यांना आळा बसण्याऐवजी ते अधिक वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.तालुक्यात संपूर्णपणे गुटखा विक्री बंद करून संबंधित माफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ३० मार्चचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर समितीचे पदाधिकारी गणेश प्रभाकरराव पाटील यांच्या स्वाक्षरी असून आंदोलनाबाबतची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच तुळजापूर पोलिस ठाण्यालाही देण्यात आली आहे.
0
7
6
5
0
5



