ब्रेकिंगमहाराष्ट्र
चिमुकल्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद; ३ वर्षांचा वाद मिटला, दाम्पत्य पुन्हा एकत्र
चिमुकल्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद; ३ वर्षांचा वाद मिटला, दाम्पत्य पुन्हा एकत्र

0
7
6
5
0
5
चिमुकल्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद; ३ वर्षांचा वाद मिटला, दाम्पत्य पुन्हा एकत्र
धाराशिव :“मला आई आणि वडील दोघांचीही गरज आहे…” या एका निरागस वाक्याने ८ वर्षांच्या चिमुकल्याने तब्बल तीन वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद मिटवला. या भावनिक क्षणामुळे विभक्त राहणारे पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेत, संसार नव्याने सुरू करण्याचा निर्धार केला.सदर दाम्पत्याचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे ते वेगळे राहत होते. हे प्रकरण धाराशिव येथील कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित होते. सुनावणीदरम्यान ॲड. एम. बी. माढेकर, ॲड. धर्मराज सरडे आणि ॲड. विशाल बारकुल यांनी दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी व समुपदेशन करत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले.
तडजोडीच्या चर्चेदरम्यान मुलाला विचारण्यात आले की, “तुला आईची गरज आहे की वडिलांची?” यावर चिमुकल्याने दिलेले उत्तर उपस्थितांना भावूक करून गेले. “मला आई आणि वडील दोघांचीही गरज आहे, त्यांनी माझ्यासाठी एकत्र राहावे,” अशी त्याची साधी पण हृदयस्पर्शी इच्छा होती.
या उत्तराने पालकांच्या मनातील दुरावा आणि कटुता क्षणात विरघळली. मुलाच्या भविष्याचा विचार करत त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशन कक्षात दोघांनी आनंदाने नव्याने संसार सुरू करण्याचे मान्य केले.
महाराष्ट्र फॅमिली कोर्ट रूल्स १९८७ च्या कलम ३१ अन्वये तयार करण्यात आलेल्या तडजोडपत्रावर दोन्ही पक्षकारांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, आजपासून हे दाम्पत्य एकत्र राहून आपल्या मुलाचा सांभाळ करणार आहे.
वकिलांनी केलेल्या समुपदेशन व सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांमुळे एक विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले असून, या घटनेने मानवी नात्यांमधील प्रेम आणि समजुतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
0
7
6
5
0
5



