तुळजापूरात नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे भाविकांना दुर्गंधीचा त्रास; तातडीच्या कारवाईची मागणी – सामाजिक कार्यकर्ते चिन्मय मगर
तुळजापूर : चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे भाविकांनसह स्थानिक नागरिकांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. भवानी रोडवरील सोनेश्वर गणेश मंदिराच्या पाठीमागे असलेले नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय सध्या अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून दररोज हजारो भाविकांचे ये-जा सुरू असते. मात्र, शौचालयाची नियमित साफसफाई होत नसल्याने व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भाविकांना नाक दाबून या मार्गाने जावे लागत असून, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.नगरपालिकेकडून स्वच्छतेबाबत मोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णतः विपरीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून तुळजापूरची ओळख असताना, अशा प्रकारची अस्वच्छता शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरत आहे.
दरम्यान, या समस्येबाबत स्थानिक नागरिकांसह चिन्मय मगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भाविकांकडूनही तात्काळ उपाययोजनांची मागणी होत आहे. नगरपालिकेचे शौच्छालयाचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षे झाले तरीही स्वच्छालय कुलूप बंद अवस्थेत आहे आणि शौचालयाच्या परिसरातील नियमित स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि दुर्गंधी नियंत्रणासाठी नगरपालिकेने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही चिन्मय मगर यांनी दिला आहे.