Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरकरांचा शांत अंडरकरंट; सर्व उमेदवारांमध्ये धाक…धुक!

मतदारराजाची गूढ शांतता; प्रभागातील सर्व समीकरणे गुंतागुंतीची!

0 7 6 5 0 1

तुळजापूरकरांचा शांत अंडरकरंट; सर्व उमेदवारांमध्ये धाक…धुक!

मतदारराजाची गूढ शांतता; प्रभागातील सर्व समीकरणे गुंतागुंतीची!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, शहरभर एक वेगळाच “अंडरकरंट” वेगाने रुंजी घालताना दिसत आहे. वरून शांत आणि संयमी भासणारा मतदारराजा प्रत्यक्षात मात्र प्रत्येक उमेदवाराचा बारकाईने अभ्यास करत असून, सर्वच राजकीय गोटांना यामुळे धाग…धुग… सुरू झाल्याचे जाणवत आहे.

मतदार सध्या शांत बसला आहे; रॅली, प्रचारफेऱ्या, घरदारी दौरे, व्हॉट्सऑपवर – सगळं सुरू आहे. पण यामागे मतदारांचा शांत चेहरा उमेदवारांना गोंधळात टाकत आहे. कारण भेटायला गेल्यावर प्रत्येक उमेदवाराला होकार देणारा तुळजापूरकर, खरा निर्णय मात्र मतदानाच्या दिवशीच मांडणार हे आता स्पष्ट झाले आहे.

प्रभागांमध्ये सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार जोरदार हालचाली करत असले तरी मतदारांची स्कॅनिंग प्रक्रिया सुरूच आहे. उमेदवाराची राजकीय कारकीर्द, सामाजिक सहभाग, शैक्षणिक पात्रता, प्रभागाशी असलेला दैनंदिन संपर्क, नागरिकांशी उपलब्धता, तसेच वास्तवातील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्व मुद्द्यांवर नागरिक शांतपणे माहिती गोळा करत आहेत.

तुळजापूरकरांची मुख्य चिंता प्रभागातील मूलभूत अडचणी -रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी, विकासकामांतील अडथळे – याभोवती फिरत आहे. “कोण बोलतो?” यापेक्षा आता “कोण करतो?” याला अधिक वजन मिळत आहे. म्हणूनच कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला आपल्या बाजूने ठाम लाट आहे, असा दावा आत्मविश्वासाने करता येत नाही.

प्रत्यक्षात, अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्या प्रतिसादातील ‘शांतता’ उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. कारण तुळजापुरातील नागरिक आता निवडणुकीला केवळ राजकीय समीकरण म्हणून पाहत नाहीत; तर येणाऱ्या पाच वर्षांचे भविष्य कोण सुरक्षित ठेवू शकेल, याचा तोलामोलाचा अंदाज ते स्वतःच्या पद्धतीने घेत आहेत.

यामुळेच अनेक पक्षांत अंदाज बांधता न येण्याची धास्ती निर्माण झाली आहे. कोणत्या घरातून कोणत्या गोट्याला मतदान होईल, हे अगदी आजी-आजोबांनाही सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकंदरीत, तुळजापूरची निवडणूक ही केवळ प्रचार-पम्फ्लेट, सभा, नाराजगिरी-पुर्वग्रहांची लढाई राहिलेली नाही; तर मतदारराजाच्या शांत आणि परखड मनाचा निर्णायक खेळ बनली आहे.

आणि त्यामुळेच -“अंडरकरंट”ची ही लाट कोणाला उडवते आणि कोणाला उभारी देते,हे जाणून घेण्यासाठी तुळजापूरची नजर आता मतदानाच्या दिवशी खिळली आहे!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे