ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
भुलथापा आणि हवेतल्या घोषणा हेच राणा पाटील यांचं कर्तृत्व – सोमनाथ गुरवांचा घणाघात
0
7
6
5
0
5
भुलथापा आणि हवेतल्या घोषणा हेच राणा पाटील यांचं कर्तृत्व – सोमनाथ गुरवांचा घणाघात
धाराशिव, : प्रतिनिधी
“राणा पाटील यांचं कर्तृत्व सांगायचं झालं तर भुलथापा मारणे, हवेतल्या घोषणा करणे आणि जनतेला गोंधळात टाकणे एवढंच!” असा रोखठोक आरोप शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी करत महायुतीच्या ‘विकास’ दाव्यांची चिरफाड केली.

गुरव म्हणाले, “राणा पाटील यांनी मांडलेले पाच कलमी मुद्दे म्हणजे हवेतले महाल. सुरळीत पाणीपुरवठ्याचा संकल्प त्यांनी केला, पण तो कसा पूर्ण करणार हेच सांगितलं नाही. म्हणजे पहिलाच मुद्दा कोलमडला.”
रस्ते निधीवरून जोरदार टीका
रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी आणल्याचा दावा राणा पाटील करत आहेत. मात्र “मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी 20 महिने प्रक्रिया अडवून शहरवासियांना त्रास देणारे राणा पाटीलच!” असा आरोप गुरवांनी केला.“निवडणुकीच्या तोंडावर निधी आणतो म्हणणं शोभत नाही. 140 कोटींचा निधी आणला म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांनी शहराचे 360 कोटी गमावले!” असा घणाघातही त्यांनी केला.
कचरा डेपो, सफाई प्रश्न—सत्तेत असताना काय केलं?
सफाई व कचरा डेपोचे प्रश्न सोडवू असा दावा राणा पाटील यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना गुरव म्हणाले,
“2014 ते 2019 आमदार तुम्ही, त्याआधीही नगरपालिका तुमच्या ताब्यात. मग अनेक वर्ष हे प्रश्न सोडवले नाहीत, टेंडरही तुमच्या लोकांकडे. आता पुन्हा सत्ता मागण्याचा अधिकार कुठून येतो?”
उद्यानांसाठी ‘25 कोटी’चा दावा संशयित
“पाच वर्षात 25 कोटींचे उद्यान निधी आणतो” या दाव्यावरही गुरवांनी टोकाचा सवाल केला.
“महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी तीन बगीचेला ७ कोटी आणि आठवडी बाजारासाठी १० कोटी असा १२ कोटींचा निधी मंजूर केला होता. महायुती सरकार आलं आणि कामांना स्थगिती! मग 2022 ते 2025 तुम्ही झोपला होतात का?” असा प्रश्न त्यांनी उभा केला.
पारदर्शक प्रशासन? भूतकाळ सांगतो उलटचित्र!
गुरवांनी पारदर्शक प्रशासनाच्या दाव्यावरही जोरदार टीका करत,
“जिल्हा परिषद आणि 2016 पूर्वीची नगरपालिका—लोकांनी पाहिलेला तुमचा कारभार पुरावा आहे. यावर आम्ही बोललो नाहीलेलंच बरं.” असा टोला लगावला.
‘काय केलं ते दाखवा; थापा मारणं थांबवा’
“डिसेंबर 2021 पासून प्रशासक आहेत. जुलै 2022 पर्यंत महाविकास आघाडी, त्यानंतर पुन्हा तुमचीच सत्ता. 2014 ते 2019 आमदारही तुम्ही. मग या काळात काय काम केलं ते दाखवा! निवडणुकीच्या तोंडावर हवेतल्या गप्पा मारणं तुमचं एकमेव कर्तृत्व आहे.” असा थेट आरोप करत गुरवांनी राणा पाटील यांना चांगलंच लक्ष्य केलं.
धाराशिवच्या विकासासाठी खरी तळमळ कुणाला आहे हे जनता ओळखते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

0
7
6
5
0
5



